Sunday, July 25, 2010

आजचे निसर्ग-चित्रण व व्यक्तीचित्र

आज रविवार लॅंडस्केपिंग ला जाण्याचा वार. खरे तर आज डेक्कन कॉलेजला जायचे होते पण एक तर ते खूप लांब आहे तसेच गेले तीन चार दिवस सतत पाउस येतोय त्यामुळे अंगात आळस मुरलाय, तेव्हा जवळच गोखले इन्स्टीट्युट जायचे ठरले. तरीहि पावसात बाहेर पडायचा कंटाळाच आला होता.... म्हणजे स्कुटर काढा, रेनकोट म्हणजे खोगीर अंगावर चढवा... वगैरे.

काल एक नवीन वृध्दत्वाकडे झुकलेले गृहस्थ आमच्या शनिवारच्या वर्गा्ला जॉईन झालेत, मी त्यांना फोन करीत आज येणार आहेत काय विचारले तर ते निघत होते व तेच म्हणाले की त्यांना मला पिक अप करू दे का ? त्यांना दिसली नसली तरी मी माझी मान जोरात हलवली व लगेच तयार होत वाटेत पोहोचलो!

तसे आम्ही आज फार जण नव्हतोच ६-७ च होतो त्यात हे व अजून एक नूरभाई अगदिच नवीन होते. मग पहिली काही मिनीटे त्या दोघांना प्राथमिक माहीती व स्केचिंगच्या महत्वाच्या बाबी सांगत त्यांना थोडे अवगत केले व मी माझ्या कामाकडे वळलो. एक स्पॉट निवडून स्केचिंग सुरू केले व रंगवायला लागणार तेव्हढ्यात दोघे माझ्याजवळ येऊन मी काढलेल्या स्केचिंगवर व थोड्या वेळा पुर्वी सांगीतलेले मुद्दे ह्यावर चर्चा झाली व त्या दोघांनी आता मी कसे रंगवतो हे पहाण्यासाठी तेथेच ठाण मांडले. हळू हळू एकीकडे गप्पा चर्चा होत चित्र आकार घेऊ लागले. हेच ते चित्र !



आज दुसरे आलेल्या नूरभाईंच्या व्यकिमत्वाने मला आकर्षित केले होते. खरं म्हणजे त्यांना लवकर माघारी वळून बाहेर गावी परतायचे होते पण थोडीशी रिक्वेस्ट केल्यावर ते तयार झाले. बरेच दिवसात जलरंगात व्यक्तिचित्र केलेले नव्ह्ते. थोडी धाकधूक होतीच. शिवाय पावसाळ्यात जलरंग लवकर वाळत नाही, थोड्याश्याही चुकीने चित्र बाद होऊ शकते तरीही हिय्या करीत सुरुवात करून पूर्णही केले.

Saturday, July 24, 2010

मागोवा

मागिल लेख लिहून जवळ जवळ तीन हून जास्त महिने झालेत. ह्या मधील काळात कित्येक घटना घडल्यात त्याचा धावता मागोवा घेण्याचा प्रयत्न ह्या लेखात  करीत आहे. अलिकडे मी पूर्ण पणे संस्कार भारतीमय झालॊ आहे. तेव्हा ह्यातील बहुतांशी घटना संस्कार भारतीशी संबंधित असणार हे उघड्च आहे. बाकी गुरुवार शनिवार व रविवार हे चित्रकलेशी संबंधित दिवस अर्थातच चुकणे शक्य नव्हते त्यामुळे ह्या लेखा मध्ये मधून मधून माझी काही चित्रे पेरलेली असतीलच.
१) सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे आत्ता पर्यंत पुण्यातील रमणबाग शाळेत गेली कित्येक वर्षे न चुकता स्केचिंगचे वर्ग दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्या वेळेत होत आलेले आहेत. पण आम्हा कोथरूडवासियांना हा वर्ग जरा लांब पडत असे तरीहि गेल्या सात वर्षात मी हा वर्ग कधीच चुकवलेला नव्हता. आता कोथरुड च्या श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात तस्साच वर्ग १७ एप्रिल पासून त्याच वेळेत नव्याने सुरू केलेला आहे व विशेष म्हणजे त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. दर शनिवारी हा वर्ग व्यवस्थित चालू असून सरासरी १३-१५ स्त्री पुरुष नेहमी त्याचा लाभ घेत आहेत. उदघाटनाचा सोहळा पहाच...
http://roupya.blogspot.com/2010_04_17_archive.html

मध्यंतरी आम्ही काहीजण निसर्ग चित्रणासाठी हंपी म्हणजे जुन्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीत गेलो होतो. तिथे इतस्तत: मोडकळीला आलेल्या वास्तू व अवशेष आहेत. शिवाय तिथे प्रचंड शिला पडलेल्या आहेत. हा भाग म्हणजे रामायण कालातील सुग्रीवाचीहि राजधानी येथेच होती. खालील चार चित्रे तिथे काढलेली आहेत.









२) लगेचच जून महिन्या पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी संध्याकाळी ७ ते ८ ह्यावेळेत ह्याच श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात नृत्य साधना हा कार्यक्रम एक वर्षासाठी सुरू केला आहे ज्याची जबाबदारी सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांनी पेलली आहे. दर कार्यक्रमाचे वेळी एक प्रसिध्द नृत्यांगना आपली नृत्य साधना देवा पुढे सादर करणार आहे. ह्या पुर्वी ह्याच मंदिरात असाच एक वर्षभर संगीत साधनेचा कार्यक्रम सादर केला गेला होता. आपल्या सर्व कला नाहीतरी देवा पुढे समर्पणाच्या भावनेतून सादर होत होतच फळा-फुलाला आलेल्या आहेत.

ह्यातील पहिले पुष्प सौ. स्वप्ना कुर्डुकर ह्यांनी ५ जून २०१० रोजी
http://roupya.blogspot.com/2010/06/blog-post_07.html

तर दुसरे पुष्प अमृता सहस्रबुध्दे ह्यांनी १० जुलै २०१० रोजी समर्पित केले.
http://roupya.blogspot.com/search?updated-min=2010-01-01T00:00:00%2B05:30&updated-max=2011-01-01T00:00:00%2B05:30&max-results=12

३) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचे समग्र चरित्र स्फुर्तिदायक आहे. त्यातील त्यांची त्रिखंडात गाजलेली उडी अत्यंत रोमहर्षक घटना जिला ८ जुलै २०१० रोजी शंभर वर्षे पूर्ण झालीत त्या निमित्ताने गेल्या १८ जुलै २०१० रोजी गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात " तेजोनिधी सावरकर " हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. ह्या कार्यक्रमात शब्द, संगीत व नृत्यातून त्याचे ओजस्वी जीवनाचे दर्शन घडवले गेले.
त्याचे समग्र वर्णन दैनिक जागरण सिटी प्लस मध्ये वाचायला येथे मिळेल.
http://www.jagrancityplus.com/storydetail.aspx?cityid=22&articleid=27704&editionid=149&catgid=6


असे नित्य नवे व कल्पक कार्यक्रमांची रेलचेल असल्यावर लेख लिहिण्यात दिरंगाई होणे साहजिकच ना ?